धाव...
मुंबईतला पाऊस म्हणजे फक्त ऋतू नसतो... तो रोजच्या जगण्याची परीक्षा असतो. सकाळी डोळे उघडताच पहिली नजर खिडकीबाहेर जाते. पाऊस कोसळत असतो आणि मनात पहिला प्रश्न येतो, "आज लोकल वेळेवर असेल ना?" कारण आमच्यासारख्या कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांसाठी दिवस घड्याळाच्या काट्यावर सुरू होतो. हातात छत्री, पाठीवर लॅपटॉपची बॅग आणि मनात वेळेचं ओझं घेऊन घराबाहेर पडतो. रस्त्यावर पाण्याचे डोह, बसस्टॉपवर गर्दी आणि स्टेशनकडे धावणारे हजारो चेहरे... प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच भावना असते – आज ऑफिसला उशीर होता कामा नये. स्टेशनवर पोहोचल्यावर खरी शर्यत सुरू होते. प्लॅटफॉर्मवर उभं राहून येणाऱ्या प्रत्येक लोकलकडे नजरा लागलेल्या असतात. ट्रेन आली की क्षणभर वाटतं, ही लोकल नाही... तर आयुष्याची पुढची संधी आली आहे. आत शिरण्यासाठी होणारी धडपड, कोणीतरी हात देऊन आत ओढणं, तर कोणीतरी स्वतःचा तोल सावरत दुसऱ्याला जागा करून देणं... मुंबईकरांचा हा न बोलता समजणारा स्वभाव प्रत्येक पावसाळ्यात नव्याने अनुभवायला मिळतो. खिडकीबाहेर पावसाचे थेंब धावत असतात आणि आत मोबाईलवर ऑफिसचे मेसेज. "Where are you?" "ETA?" "Cl...