कोकण…भूभाग नाही, श्वास आहे!
कोकण म्हटलं की मनात सर्वप्रथम उभा राहतो तो अथांग निळाशार समुद्र… नारळी-पोफळीच्या बागांमधून अलगद वाहणारा वारा… मातीतून दरवळणारा पावसाचा सुगंध… आणि कौलारू घरांच्या ओट्यावर बसलेली माणसं… कोकण म्हणजे फक्त पर्यटनस्थळ नाही… तो एक जिवंत संस्कार आहे. एक अशी जीवनशैली, जिथे माणूस निसर्गाशी भांडत नाही… तर त्याच्यासोबत जगतो. पहाटे कोंबड्याच्या आरवण्याने जाग येते, समुद्राच्या लाटांमध्ये दिवस सुरू होतो, आणि रात्री काजव्यांच्या प्रकाशात गाव शांत झोपतं… हे सगळं आजही कोकणात कुठेतरी श्वास घेतंय. पण… हा श्वास आता धाप लागल्यासारखा वाटतोय. एक काळ होता… जिथे समुद्रकिनाऱ्यावर खेकड्यांच्या रांगा दिसायच्या, झाडांवर पक्ष्यांची घरटी असायची, आणि जंगलातल्या प्रत्येक वाटेला स्वतःचा आवाज असायचा. आज त्या वाटा शांत झाल्यात… कारण विकासाच्या नावाखाली आपण निसर्गालाच गुदमरवायला सुरुवात केली. डोंगर पोखरले गेले… झाडं तोडली गेली… नद्या दूषित झाल्या… आणि समुद्रही आता आधीसारखा नितळ राहिला नाही. ज्याला आपण “जैवविविधता” म्हणतो ना… ती कोकणाची खरी ओळख होती. आंब्याच्या बागांमध्ये गुणगुणणाऱ्या मधमाशा, पावसात ओरडणारे बेडूक, रात्री चम...